मुंबई : प्रतिनिधी
शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ सुरु करण्यात आली. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम आणि अत्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत १०३ बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेंतर्गत चालू वर्षी ८६ हजार १६६ क्विंटल शेतमाल बाजार समित्यांनी तारण ठेवला असून शेतकऱ्यांना मागील फक्त ४ महिन्यात सुमारे १६ कोटी रुपयांचे तारण कर्ज देण्यात आल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
या योजनेतून तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भरड धान्य आदीला लाभ दिला जातो. शेतकरी कमी भावाच्या काळात ही उत्पादने बाजार समित्यांकडे तारण ठेवू शकतात. यासाठी त्यांना बाजार समिती मार्फत मोफत गोदाम उपलब्ध करुन दिले जाते. तसेच फक्त ६ टक्के इतक्या कमी व्याज दरात शेतकऱ्यास शेतमालाच्या त्यावेळी असलेल्या भावाच्या ७५ टक्के रकमे इतके कर्ज लगेच उपलब्ध करुन दिले जाते. त्यानंतर वाढीव भावाच्या काळात शेतकरी आपला माल विकू शकतो व कर्जाची परतफेड करुन वाढीव रक्कम त्याला परत मिळते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोफत गोदाम, गरजेच्या वेळी कर्ज आणि शेतमालास चांगला भाव मिळण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेत आतापर्यंत १०३ बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. २०१३ मध्ये ही संख्या फक्त ३३ इतकी होती. राज्यातील उर्वरीत बाजार समित्यांनीही या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री देशमुख यांनी केले आहे.
गोदाम बांधकामासाठी निधी
ही योजना प्रभावीपणे राबविता यावी यासाठी बाजार समित्यांकडे चांगल्या क्षमतेची गोदामे उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी बाजार समित्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तारण ठेवलेल्या मालाच्या बदल्यात त्यांना द्यावयाच्या कर्जासाठीचा निधीही राज्य कृषी पणन मंडळामार्फत बाजार समित्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेतून बाजार समित्यांचेही सक्षमीकरण होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.