मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा ७०० रूपये अतिरिक्त देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर धान उपादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार जो हमीभाव देईल त्यापेक्षा जास्त भाव राज्य सरकारकडून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रती क्विंटल सातशे रुपये (Paddy Procurement Incentive Support) देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे १४०० कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येईल.
खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी १८६८ रुपये व ग्रेड धानासाठी १८८८ रुपये इतकी निश्चित केली आहे. मात्र, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या धानासाठीच ही राशी मिळेल. या वर्षी १ कोटी ७८ लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल.