मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांना चुकीची वीज बील देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ही चुकीची बीले भरूनही वीज जोडणी तोडण्यात येत आहे. तर काही शेतकऱ्यांना २६ हजार इतक्या रकमेची वीज बीले पाठविण्यात येत असून वीज बील न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडण्यात येत असल्याची बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केली.
त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत मागील तीन वर्षे राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांची वीज बीले थकीत आहेत. यापैकी ग्रामपंचायतींची वीज बीले सरकारने भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणारी वीज बीलांच्या दुरूस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे वीज बील भरले नाही म्हणून वीज जोडणी तोडण्याच्या महावितरणच्या कामास स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा केली.
तसेच राज्यातील शेतकरी व ग्रामपंचायतींकडे १७ हजार कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता वीज तोडणीला स्थगिती दिल्याने कोणत्याही शेतकऱ्यांची वीज तोडली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.