मुंबईः प्रतिनिधी
केंद्र आणि राज्य सरकारला ४ वर्षे पूर्ण झालेली असून डिसेंबर ते मार्च दरम्यान लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीच्या सोबतच राज्यातील विधानसभेच्या निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने सर्वच मंत्र्यांच्या पीए, ओएसडी आणि खाजगी सचिवांकडून मंत्र्याकडे गाऱ्हाणी घेवून येणाऱ्या लोकांची कामे करावीत यासाठी त्या त्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामे करण्यासाठी विनवण्या तर प्रसंगी आदेशवजा धमक्यांचे फोन सुरू झाले आहेत. तसेच अहो कामे करा नाहीतर लोक मंत्र्यांना समोरच शिव्या घालतील अशा भाषेत संबधित अधिकाऱ्यांना सुणावन्यासही मंत्र्यांचे पीए, ओएसडी मागेपुढे पहात नसल्याचे चित्र मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या दालनात पाह्यला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातील १५ वर्षात झालेली कामे आणि भाजप-शिवसेनेच्या ४ वर्षाच्या काळातील सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर अर्धवट राहीलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सर्व विभागाच्या मंत्र्यांना देत स्थानिक पातळीवरील प्रशासनाशी समन्वये साधण्याचे निर्देशही दिले. त्यामुळे मंत्र्यांच्या मतदारसंघातील, जिल्ह्यातील नागरीकांची आलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांकडून त्यांच्या पीए, ओएसडी, विभागाच्या सचिवांना आणि खाजगी सचिवांना रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश देण्यात आले. मंत्र्यांच्या या आदेशानुसार मंत्र्यांच्या प्रत्येक अधिकाऱ्याकडून अपूर्ण राहीलेल्या कामाची यादी घेवून संबधित विभागातील, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी सांगितलेली कोणती कामे पूर्ण केली याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच झालेल्या कामांची व्यक्तीनिहाय माहिती मंत्री कार्यालयाकडे पाठवून देण्याचे किंवा प्रत्यक्ष येवून सांगण्याचे आदेशही सोडण्यात येत आहेत.
अधिकारी मात्र मंत्र्यांच्या आदेशांना जुमानेना
मंत्री कार्यालयाकडून आलेली कामे पूर्ण झाली का? याची माहिती घेण्यासाठी स्थानिक पातळीवर फोना-फोनी करण्यास सुरुवात केली. तर अनेक अधिकारी हे मंत्र्यांचे पत्र अथवा कागदपत्रे आली नसल्याचे सबब पुढे करत होते. तसेच मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनाच पुन्हा ती कागदपत्रे पाठविण्यास सुचवित आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरील अधिकारी जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने अखेर या मंत्र्यांच्या ओएसडी, पीएची तारांबळ उडाल्याने अहो अधिकाऱ्यांनो कामे करा नाहीतर मंत्र्यांना लोक समोर बसून शिव्या घालतील अशा शब्दात आर्जवे करत आहेत.
Tags cm fadnavis government officers mantralay minister
Check Also
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो
देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …