महाराष्ट्रात शिंदे सरकारमध्ये सामील होण्याआधी नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता. हा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेनेच घेण्यात आला होता असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केला.
सोमवारी, गरवारे क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नागलँडचे सहा आमदार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नेतृत्वात सत्तेत सहभागी होऊन आम्ही कोणती वेगळी भूमिका घेतली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदीसह नागालँड विधिमंडळातील राष्ट्रवादीचे सातही आमदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, महाराष्ट्र विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी ४३ विधानसभा आणि विधान परिषदेच्या ९ पैकी ६ आमदारांनी तसेच नागालँड विधानसभेतील ७ पैकी ७ आमदारांनी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य केले. राष्ट्रवादी पक्षाच्या ३० जून रोजीच्या बैठकीत अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करुन पुढे जाण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात होता. तेंव्हाच नागालँडमधील राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास संमती दर्शवली होती. त्यामुळे अजित पवार हेच आमच्या पक्षाचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी काळात पक्ष वाटचाल करणार असल्याचे सांगितले.
पुढे प्रफुल पटेले म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानानुसार पक्षातंर्गत निवडणुका झालेल्या नाहीत. केवळ अधिवेशन बोलावून पदाधिकाऱ्यांच्या निवडी करणे हे पक्षाच्या घटनेला अनुसरुन नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून पक्षातंर्गत निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे पक्षातील सध्याच्या नियुक्त्यांना काहीही अर्थ नाही. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगाचा असून ६ ऑक्टोंबर पासून यांसंदर्भातील सुनावणी निवडणूक आयोग घेण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील शरद पवार यांच्या सोबत व्हायरल झालेल्या फोटोसंदर्भात बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्यासोबतची आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी वैयक्तिक शत्रूता नाही. राजकीय जीवनात शिष्टाचार पाळवा लागतो, त्यामुळे भेटणे, फोटो काढणे यात काही गैर नाही असे समर्थनही केले.
दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडण्यासाठी शरद पवार यांनी नागालँड येथील भाजपा पुरस्कृत सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याचे यापूर्वीच जाहिर केले होते. तसेच तेथील भाजपा सरकार पाठिंबा देताना नागालँड हे देशाच्या सीमेवरचे राज्य आहे. त्यामुळे तेथे स्थिर सरकार असणे आवश्यक असल्याने राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचे सांगितले होते.