शिवसेनेचा आज ( १९ जून ) ५७ वा वर्धापनदिन आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापनदिन साजरे करण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेतील आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, शिवसेना अभेद्य राहावी, अशी इच्छाही भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
छगन भुजबळ, मी १९७३ साली नगरसेवक, तर १९७८ ला शिवसेनेचा गटनेता झालो. तेव्हापासून शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी बोलण्याची संधी मला दिली. नंतर महापौर, आमदार होत महाराष्ट्रात शिवसेनेचं काम केलं. पण, शिवसेना फुटली हे मनाला अजूनही पटत नाही, अशी खंतही व्यक्त केली.
अचानक विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे हे शिंदे गटात कशा गेल्या कळलं नाही. कारण, १० महिन्यांपासून ते शिंदेंच्या विरोधात बोलत होत्या. त्या उद्धव ठाकरेंच्या कट्टर शिवसैनिक असल्याचं मला वाटलं. मात्र, हा प्रवाह अजूनही चालू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमच्या मनात कायम आहे. या दोन शिवसेनेत खरी कोण, हे लोक सांगतील, असं म्हणाले.
शिवसेना फुटली याचं वाईट वाटतं. कठीण प्रसंगात बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याबरोबर शिवसैनिक उभे राहायचे. बाळासाहेबांनी एकदा शब्द दिल्यावर पोलीस येतील, अटक होईल याची भीती नसायची. ती शिवसेना विस्कळीत झाली. मी, राज ठाकरे, नारायण राणे सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडलो. पण, शिवसेना अभेद्य राहावी, ही मनापासून इच्छा आहे, असेही भुजबळांनी म्हटलं.