महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे अनेक प्रकल्प यापूर्वीच परराज्यात गेले असताना आता अजून एक प्रकल्प परराज्यात गेल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमान पत्राने दिलेल्या बातमीने समोर आल्याचे ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत याबाबत राज्य सरकारला दानवे यांनी जाब विचारला. तसेच राज्यात येणारी गुंतवणूक कमी होत असल्यामुळे राज्य अधोगतीला जाते की काय अशी शंका व्यक्त करत राज्याची प्रगती, तरुणांचा रोजगार दुसऱ्याच्या घशात घालण्याबाबत घालण्याबाबत अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे गेल इंडिया ही पेट्रोकेमिकल्स कंपनी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. या गुंतवणुकीच्या माध्यमातून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राचा वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला? याचे उत्तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी द्यावे, अशी मागणीही यावेळी केली.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, सदर कंपनीने प्रकल्प उभारणीच्या जागेसाठी विचारणा केली होती का? विचार केला होता तर त्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प का नाकारला? सरकारी कंपनी असल्याने मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का? याची उत्तरे सरकारने द्यावी, असा जाबही यावेळी विचारला.
अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक केंद्राच्या दबावामुळे सतत परराज्यात जातेय. एकप्रकारे प्रधानमंत्री हे महाराष्ट्रावर बेगडी प्रेम दाखवत आहेत. राज्यातील तरुणांच्या हाताला मिळणार रोजगार हिसकावून दुसऱ्याच्या घशात घालण्याचे पाप भाजपा करत असल्याचा आरोपही केला.