काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटात न्यायालयीन संघर्ष पाह्यला मिळाला. त्यापाठोपाठ ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरूनची लढाई ही न्यायालयात पोहोचली. मात्र न्यायालयाने शिंदे गटालाही परवानगी दिली. त्यानुसार ठाण्यात एकाबाजूला ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे तर दुसऱ्याबाजूला शिंदे गटाकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे गटाकडून आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी बोलतानाही मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरे गटावर निशाणा साधला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एक सामना खेळलो आणि जिंकलो, असे सांगत शिंदे गटाची तुलना भारतीय टीमसोबत अप्रत्यक्ष केली.
दिवाळीबरोबच काल भारताने पाकिस्तानविरुद्ध जो सामना जिंकला, त्याचा आनंदही आपण आज साजरा करतो आहे. तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल तर, काल मेलबर्नच्या मैदानातही आपली ‘बाळासाहेबांची शिवसेना हा बॅनर झळकली होती. कालचा सामना जसा जिंकला, तसाच सामना आम्ही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी खेळलो आणि जिंकलोही. तो सामना महाराष्ट्राने, देशाने बघितला. लोकांच्या मनातलं राज्य आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत येताच, आधी आपली परंपरा, संस्कृती, सण, उत्सव साजरे करण्याची परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले.
खरं सांगायचं तर विकासाबरोबर या गोष्टीही आवश्यक आहेत. माणसाचे मन प्रसन्न असेल, तर त्याला पुढे जाता येतं. या राज्यात आता एक परिवर्तनाचे पर्व सुरू झाले आहे. आज मी ज्या ठिकाणी जातो, तिथे उत्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो. या गोष्टींचे समाधान आणि आनंदही वाटतो. त्याचे परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसून आले, असेही ते म्हणाले.
दरम्यान शिंदे यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, ते मैदानात लढले. पण तुम्ही गद्दारी करत पळून गेलात. त्यामुळे उगाच त्यांच्याशी तुलना करू नका असा टोलाही लगावला.