अमरावती येथील धारणीतील रुक्मिणी नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीला एका मुस्लिम तरूणाने पळवून नेऊन तिच्या मनाविरोधात लग्न केल्याचा आरोप करत हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कांगावा भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला. मात्र मुलीचा शोध लागल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. ही तरुणी रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आल्याने खासदार नवनीत राणा, भाजपा आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान या अगोदर या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांकडे चौकशी केली असता, त्यांचा फोन रेकॉर्डिंग करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यानंतर नवनीत राणा यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत पोलिसांशी हुज्जत घातल्याचे समोर आले.
या दोन्ही मुद्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहखात्याची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांना उद्देशून दोन प्रश्न उपस्थित केले.
सचिन सावंत यांनी ट्विट मध्ये विचारलेले प्रश्न खालील प्रमाणे..
सन्माननीय फडणवीस साहेब, १. पोलिसांनी मोबाईलवर फोन रेकॉर्डिंग अॅप ठेवायचा नाही असा पोलीस मॅन्युअलमध्ये नियम आहे का? यावर प्रकाश टाकावा अन्यथा पोलिसांच्या सन्मानाचे रक्षण करावे.
२. ‘लव्ह जिहाद’ नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का? मग कारवाई का नाही? असे दोन प्रश्न सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे उपमुख्यमंत्री फडणवीसांना विचारले.
ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणात अल्पसंख्याक समुदायातील एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ‘लव्ह जिहाद’चे हे प्रकरण असून या युवतीला पळवून नेल्याचा आरोप बुधवारी खासदार नवनीत राणा, भाजपा आणि हिंदूत्ववादी संघटनांनी केल्याने राजापेठ पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, वास्तव समोर आल्यावर ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा बागुलबुवा उभा करण्यात आला, शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी चर्चा आता सुरू झाली.
या तरुणीने मंगळवारी दुपारी बँकेतून ३ हजार रुपये काढले. नंतर ती रेल्वेने पुण्याच्या दिशेने रवाना झाली. या युवतीला सातारा रेल्वे पोलिसांच्या मदतीने सातारा येथून ताब्यात घेण्यात आले. ती एकटीच प्रवासात होती. तिच्यासोबत दुसरे कुणीही नव्हते. प्राथमिक चौकशीदरम्यान तिने आपण रागाच्या भरात घरून निघाल्याचे सातारा पोलिसांना सांगितले आहे.
सन्माननीय फडणवीस साहेब,
१. पोलिसांनी मोबाईलवर फोन रेकॉर्डिंग अॅप ठेवायचा नाही असा पोलिस मॅन्युअलमध्ये नियम आहे का? यावर प्रकाश टाकावा अन्यथा पोलिसांच्या सन्मानाचे रक्षण करावे.
२. लवजिहाद नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का? मग कारवाई का नाही?— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 9, 2022