मुंबई : प्रतिनिधी
एक मार्च रोजी तारांकित प्रश्न सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली नव्हती. मात्र त्यावेळची प्रश्नोत्तरे आज सभागृहाच्या पटलावर ठेवलीत. मग काल सोमवारी उद्योगमंत्र्यांनी एक मार्च रोजीच्या तारांकित प्रश्नामधील न झालेल्या प्रश्नाबद्दल खुलासा करणे कितपत योग्य असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना करत सभागृहाचे कामकाज नियमबाह्य पध्दतीने सुरु असल्याचा आरोप केला.
त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी एक मार्चच्या कामकाजाची माहिती घेवून त्याचे उत्तर देतो असे आश्वासन जाधव यांना दिले. त्यावर पुन्हा अर्धा तास चर्चा कधी लावणार असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला. त्यास लवकरच याबाबत चर्चा लावणार असल्याचे आश्वासन बागडे यांनी यावेळी दिले.
याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित करत १ मार्चला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिलेले छापील उत्तर खरे की त्या सोमवारी केलेले निवेदन खरे असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री सभागृहात असल्याने त्यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक मार्चला सभागृहाच्या पटलावर प्रश्नोत्तरे ठेवली की नाही? याबाबत अध्यक्ष महोद्य निकाल देतील. मात्र नाणार प्रकल्पाबाबत प्रसारमाध्यमात उलट सुलट बातम्या आल्या म्हणून उद्योग मंत्र्यांनी त्यावर निवेदन केले.
यावर जयंत पाटील आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी पण राज्य सरकारची नाणार प्रकल्पाबाबत भूमिका काय अशी विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भास्कर जाधव यांनी मागणी केल्याप्रमाणे अर्धा तासाची चर्चा लागल्यावर त्याबाबतची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगत स्पष्टपणे उत्तर देण्याचे टाळले.