Breaking News

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा देशाचे संविधान व एकात्मता अबाधित राखण्यासाठी काँग्रेसचा लढा !: नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाने देशाच्या ज़डणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने नियोजनपूर्वक आखणी करुन विकासकामे राबवली, त्यातूनच पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, शिक्षण, रस्ते, पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उभी राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि काँग्रेस विचाराने देशातील एकात्मता कायम ठेवली गेली. परंतु मागील ७ वर्षापासून ही सर्व व्यवस्थाच मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस पक्षासाठी संविधान व देशाची एकात्मता सर्वोच्च असून ती अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करत असल्याची ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाअंतर्गत नाना पटोले औरंगाबादमधील कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ज्या लोकांचा देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत सहभाग नव्हता तेच लोक धर्माच्या नावावर देश तोडण्याची भाषा करत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविदांने नांदत असताना धर्माच्या नावावर राजकारण करुन तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. १४ ऑगस्ट हा दिवस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याचा भाजपाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला. ज्या दिवशी देशात रक्तपात झाला त्या दिवसाच्या स्मृती कशाला जागृत करता ? देशात मागील ७ वर्षांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. सरकारच्या विरोधात लिहिणाऱ्या-बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते. शेतकरी ९ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत त्याची साधी दखलही पंतप्रधान घेत नाहीत. बेरोजगारी, महागाईचा प्रश्न गंभीर असून देशातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरुणांनीच आवाज बनून उभे ठाकले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष एम. एम. शेख, संजय राठोड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपत कुमार, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद हिशम उस्मानी, जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, माजी खासदार उत्तमसिंग पवार, प्रदेश सरचिटणीस तथा ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाचे समन्वयक विनायक देशमुख, अभय छाजेड, मिनाताई शेळके, मुज्जफर खान, पापा मोदी, जितेंद्र देहाडे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

यावेळी स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात करण्यात आले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *