Breaking News

भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला लागले म्हाडाचे वेध, जोडीला राष्ट्रवादीची शिफारस झोपडपट्टी सुधार मंडळाच्या मुख्याधिकारी पदी नियुक्तीसाठी लॉबींग

मुंबई : विशेष प्रतिनिधी

साधारणत: दोन वर्षापूर्वी महसूल विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आणि सहकार विभागातील समकक्ष अधिकाऱ्यांना आयएएस पदावर प्रमोशन मिळवून देण्याप्रकरणी मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अधिकाऱ्याला म्हाडात येण्याचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे त्या पदावर सदर अधिकाऱ्याला नियुक्ती मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिफारस पत्र दिल्याची धक्कादायक बाब माहिती पुढे आली आहे.

मुंबई शहरातील झोपडपट्टीवासियांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पूर्वी स्वतंत्र असलेल्या आणि म्हाडाचा भाग असलेल्या झोपडपट्टी सुधार मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळामार्फत मुंबईतील आमदार-खासदार आणि केंद्र व राज्य सरकारकडून विकास निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या मंडळाच्या मुख्याधिकारी पदी महसूल विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जाण्यास इच्छुक असतात. तसेच येथे मिळणाऱ्या टक्केवारीची चर्चा नेहमीच म्हाडाबरोबर इतरही सरकारी कार्यालयात नेहमीच रंगलेली असते. या मंडळाचे विद्यमान मुख्याधिकाऱ्यांचा कालावधी फेब्रुवारी २०२० मध्ये संपलेला असून त्यांच्या ठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी रसाळ नामक सहकार विभागातील एक अधिकारी प्रयत्न आहे. या अधिकाऱ्याला त्या पदावर नियुक्त करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सदर विभागाच्या मंत्र्याला शिफारस दिल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली असून त्याची प्रत मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थळाकडे उपलब्ध आहे.

दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्षांनीच असे पत्र दिले असल्याने संबधित खात्याचे मंत्री असलेले राष्ट्रवादीच्या आमदारांनीही या अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रशासनाला प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले असून त्याचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यासाठी खाजगी सचिवाला पाठपुरावा करण्यास सांगितले आहे. त्यानुसार खाजगी सचिव नियमित सकाळ-संध्याकाळ अधिकाऱ्यांना प्रस्तावाचे काय झाले याची माहिती घेवून मंत्र्यांना सादर करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी कोणत्या प्रकरणात रसाळ यांना अटक केली

राज्याच्या सेवेत असलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा समकक्ष पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना एका ठराविक कालवधीनंतर युपीएससी कडून आयएएस अधिकारी पदावर प्रमोशन देण्यात येते. या अधिकाऱ्यांना प्रमोटेड आयएएस अधिकारी म्हणून प्रशासनात ओळखले जाते. यासाठी रसाळ हे सुध्दा स्वत: प्रयत्नशील होते. त्यासाठी ते दिल्लीला दोन वर्षापूर्वी गेले होते. मात्र काम झाले नसल्याने विमानाने मुंबईला परतले. मुंबई विमानतळावर उतरले असता त्यांना विमानतळावरच मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत ४० ते ७० लाखाची रोकड होती अशी चर्चा मंत्रालयात रंगली होती.

 

Check Also

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *