मराठी ई-बातम्या टीम
देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील निवडणूकांची प्रक्रिया सुरु झालेली असताना यातील पाचही राज्यात विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये भाजपा मूळ मुद्यावरून भरकटत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर एकाबाजूला काँग्रेसला जनताच नाकारत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करतानाच दुसऱ्याबाजूला देशात कोरोनाच्या प्रसारास महाराष्ट्र काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत विरोधीभासी वक्तव्य लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर केल्याने पंतप्रधान मोदी यांना पाच राज्यातील निवडणूकीत पराभव स्पष्ट दिसत असावा किंवा त्यांच्याकडे राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला शब्दच नसल्याची चर्चा आता राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकांची यादीच वाचवून दाखवित आता मोदी सरकारच्या धोरणामुळे सगळीकडे प्रश्नच निर्माण होत असल्याचा आरोप करत आता तुम्ही थांबा अशी खोचक सूचना केली होती. तसेच चीनची घुसखोरी, चीन-पाकिस्तान युती, ईशान्य भारतात निर्माण होत असलेली अशांतता आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर भारत एकटा पडत असलेले चित्र या मुद्यावरून चांगलेच घेरले होते.
राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देताना काँग्रेसच्या पराभवाची यादी वाचत अनेक राज्यात शेवटची सत्ता मिळवून २५ वर्षाहून अधिक काळ लोटल्याची माहितीच त्यांनी सभागृहात ठेवली. तसेच देशातील जनताच काँग्रेसला नाकारत असल्याचे यावरून दिसत असल्याचे एकाबाजूला ठासून सांगत काँग्रेस लोकांमध्ये जात नसल्याचा आरोप केला.
तर याच भाषणात मात्र त्यांनी ऐन कोरोनाच्या काळात मुंबईत महाराष्ट्र काँग्रेसकडून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडच्या कामगारांना परत जाण्यासाठी मोफत तिकीटे काढून दिली, त्यांना पैसे दिले. हे सर्व मजूर परत आल्याने उत्तर प्रदेश, बिहार राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचा अजब आरोप त्यांनी केली. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीच परस्पर विधाने करत असल्याचे दिसून येत आहे.
त्यांच्या या विधानाने ज्या काँग्रेसला जनता नाकारत असल्याचे एकाबाजूला सांगताना दुसऱ्याबाजूला त्याच काँग्रेसच्या सांगण्यावरून परप्रांतीय मजूर परत कसे जातील असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे एकतर मोदींना राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर नाही किंवा पाचही राज्यात भाजपा पराभवाच्या छायेत दिसत असल्याने मोदींना नवे मुद्दे मिळाले नसल्याचे दिसून येत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.
मात्र कोरोना काळात महाराष्ट्र काँग्रेसने मजूर कामगारांसाठी केलेल्या कामाची यादीच प्रसिध्द केली आहे.