श्रीहरीकोटाः प्रतिनिधी
आज भारताचं चांद्रयान २ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे.
चांद्रयान २ हे इस्त्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान २ चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपण झाल्यानंतर सगळ्यांनीच टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. चांद्रयान २ या यानाचा हा सुरुवातीचा काळ आहे. सुरुवातीला रॉकेटचा वेग नियमित असणार आहे. चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावल्याने इस्रोने पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचला आहे.
हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी होणारं हे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्रोने आज म्हणजेच सोमवारी दुपारी २.४३ मिनिटांची वेळ चांद्रयान२ मोहिमेची वेळ निश्चित केली.
चंद्रापासून ३० किमी अंतर राहिल्यानंतर चांद्रयान २ चा वेग कमी करण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची १५ मिनिटं महत्त्वाची आहेत असं के. शिवन यांनी म्हटलं आहे. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास तो जगातला चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावले आहे.
सुरुवातीचे २३ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच असणार आहे. २५० वैज्ञानिकांची या यानावर नजर असणार आहे.
चांद्रयान २ ची वैशिष्ट्ये काय?
चांद्रयान २ चे वजन ३.८ टन इतके आहे
भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान २ एक चांगलं उदाहरण ठरणार आहे
या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न अद्याप कुणीही केलेला नाही.
चांद्रयानाचे नाव बाहुबली
मात्र चांद्रयान आणि बाहुबली सिनेमा यांचं कनेक्शन तुम्हाला ठाऊक आहे? चांद्रयान २ चे वहन करणाऱ्या रॉकेटला बाहुबली हे नाव देण्यात आले. हे रॉकेट अत्यंत भव्य असल्याने हे नाव निवडण्यात आले. आमच्या सिनेमाचे नाव भारताच्या चांद्रयान मोहिमेशी संबंधित आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे असे ट्विट बाहुबली या ऑफिशियल अकाऊंटच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे.
या मोहिमेत बाहुबली या नावाचा वाटा होता हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे असेही या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे. तसेच हे चांद्रयान अवकाशात सोडण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचेच आम्ही अभिनंदन करतो असेही या ट्विटमध्ये नमुद करण्यात आले आहे.
सगळ्याच भारतीयांसाठी अभिमानाची असणारी ही मोहीम आहे.