मुंबई : प्रतिनिधी
देशातील तमाम मागासवर्गीयांच्या ७० हून अधिक पिढ्यांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत आणि स्वाभिमानाचे अंकुर फुलविणाऱे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटल्याचे चित्र चैत्यभूमी आणि दादर परिसरात पाह्यला मिळाले. काल रात्रीपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनुयांयाबरोबरच देशातील झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि राजस्थान राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने आले.
दादर स्टेशनहून चैत्यभूमीला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जब-तक चाँद रहेगा- बाबा तेरा नाम रहेगा सारख्या अनेक घोषणा देत मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी अनुयायी जात होते. अनेक सामाजिक संघटनांकडून अभिवादन रँली काढण्यात आली होती. त्या रँलीही शिस्तबध्द रितीने चैत्यभूमीकडे जात होत्या.
मुंबईतील अनेक सामाजिक संस्था, मंडळे आणि धर्मादाय संस्था, व्यापाऱ्यांच्या संघटनांनी दादर परिसरात येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी मोफत चहा-नाष्टा, जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर काही संघटनांकडून त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्यावतीने शिवाजी पार्कवर आलेल्या अनुयांयासाठी आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
चैत्यभूमीवर बाबांना अभिवादन केल्यानंतर अनेक अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित साहित्य खरेदी करण्यासाठीशिवाजी पार्कवरील पुस्तकांच्या दुकानात गर्दी करताना दिसत होता.