शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित पक्षातील ५० आमदारांना सोबत घेवून राज्यात भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यानंतर खासदारांना आपल्या गटात सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर आले. आज दुपारी १२ खासदारांना आपल्या गटात सहभागी करून घेतल्यानंतर त्या १२ खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे हे पत्रकार परिषदेला सामोरे गेले.
त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यांचा सकाळचा मॅटनी शो बंद झाला त्यांची दखल घेण्याची गरज नसल्याचा खोचत टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार स्थापनेसह त्यांच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांबाबत माहिती दिली.
शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या खासदारांवर ‘ईडी’चा दबाव असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला. संजय राऊतांचा सकाळचा शो बंद झाला आहे. ते आता दखल घेण्यासारखे नाहीत. दुसरं कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. मात्र, संजय राऊत दखल घेण्यासारखे नाहीत असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. शिंदे गट हा फुटीर गट आहे. हा गट कार्यकारिणी घोषित करू शकत नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यांना शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्याचा अधिकार नाही. शिवसेना आजही भक्कमपणे उभी आहे. तसेच शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेवर बोलताना, या १२ खासदारांवर ‘ईडी’चा दबाव असल्याचे म्हणाले होते.