उद्धव ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’ला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता थेट टीका केली आहे. प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वतःला नरेंद्र मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. त्यामुळे भाजपवाल्यांनो सावधान, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. विधानसभेच्या निवडणुका होऊ द्या, मग दाखवतो, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले आहे.
भाजपा यांना कधी पुढे करील असे वाटत नाही. कारण ते स्वतःची तुलना नरेंद्रभाईशी करतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा अशी घाणेरडी असते, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना लगावला. दिल्लीवाल्याना शिवसेना विरुद्ध शिवसेना असा झगडा लावून महाराष्ट्रात मराठी माणसांकडून मराठी माणसांची डोकी फोडायची आहेत, असा आरोपही ठाकरे यांनी लगावला आहे, ज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल, असा विश्वास व्यक्त करताना ठाकरे यांनी मला शिवसेना वाढवायची आहे, असे ठासून सांगितले आहे.
शेवटच्या काळात मी विश्वासघातक्यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असे विचारले होते. याविषयी आपण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलू. भाजपसोबत जायचे आहे का तर भाजपकडून आपल्याला दोन-तीन प्रश्नांची उत्तरे मिळू द्या. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सांगू की माझे तुमच्या सोबत काही आनंदाने राहायला तयार नाही. पण त्यांच्यात तेवढी हिम्मत नव्हती. कारण काहीच नाही, रोज नवी कारणे पुढे येत आहेत, असेही ठाकरे यांनी शिंदे यांना उद्देशून म्हटले आहे.
ज्या आमदाराना २०१४ साली भाजपाने दगा दिला तरीसुद्धा त्यांना भाजपसोबत जायचे आहे. २०१९ साली सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही. शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी याच आमदारांच्या विरोधात भाजपने त्यांचे बंडखोर उभे केले होते. म्हणजे भाजपला तेव्हा आणि आताही शिवसेना संपवायची होती, असे ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले आहे.
फुटीर आमदारांकडून आलेल्या दबावाबद्द्लही उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत खुलासा केला आहे. भाजपसोबत जाऊ असे म्हणणाऱ्या सर्व आमदारांना माझासमोर आणा, असे मी सांगितले होते. दोन तीन प्रश्न माझी मनात आहेत. एक म्हणजे कारण नसताना शिवसैनिकाना ईडीपीडा लावली. त्यांचा छळ चालवलाय. हिंदुत्वासाठी दंगलीत लढलेले शिवसैनिक असतील किंवा हिंदुत्वाची बाजू लावून धरणारे असतील यांना एकदम छळायला लागला आहात. हा छळ कुठपर्यंत चालणार? दुसरा प्रश्न, त्यावेळी जे ठरवून नाकारले त्याचे यावेळी भाजप काय करणार? शिवसेनेला सन्मानाची वागणूक कशी देणार? मातोश्री बद्दल अश्लाघ्य भाषेत बोलले गेले त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? मातोश्री बद्दल बोलूनही तुम्ही शेपट्या घालून जाणार का? असे प्रश्न आपण आमदारांना केले होते, असे ठाकरे यांनी मुलाखतीत नमूद केले आहे.
आपण साधारणपणे ऑगस्ट मध्ये बाहेर पडू. राज्यात एकदा सदस्य नोंदणीचे काम होऊ द्या, मग मी बाहेर पडेन. सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. संपूर्ण राज्याचा दौरा होईल. आपण राज्यात वादळ निर्माण करू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.