मराठी ई-बातम्या टीम
भाजपाच्या सीडेतीन नेते अनिल देशमुखांच्या कोठडीत जातील आणि देशमुख बाहेर येतील असे वक्तव्य करत काल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नेल सोमय्या यांच्या कंपनीत पीएमसी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांच्याबरोबर असलेली पार्टनरशीपसह त्यांच्या कथित घोटाळ्याबाबतचा गौप्यस्फोट शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. त्यावर सोमय्या यांनी कालच यासंदर्भातील खुलासा करत माझ्या प्रश्नांची उत्तरे राऊतांनी दिली नसल्याचे स्पष्ट केले.
त्यावर आज सकाळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना लक्ष्य करत म्हणाले की, उध्दव ठाकरे यांचे जे १९ बंगले आहेत म्हणता ते बंगले आहेत का? ते आधी सांगा ती कर भरल्याची कागदपत्रे दाखवू नका असे सांगत सोमय्या पिता-पुत्र नक्की आत जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपाचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार असे मी सांगितले होते. तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेन. पण जसे जसे ते आतमध्ये जातील तसे तसे तुम्ही मोजत जा. सोमय्या पितापुत्र नक्कीच जेलमध्ये जात आहे. दुसऱ्यांना धमक्या देता? तुम्ही जेलमध्ये जा. ईडीच्या नावे धमक्या, क्रिमिकल सिंडिकेट, खंडण्या हे जे काही सुरु आहे त्याचा भांडाफोड होईल असा इशारा देत अर्जुन खोतकर यांना ईडीने कसा आणि काय त्रास दिला हे मला माहिती असल्याचे ते म्हणाले.
मुंबईतील बिल्डर, व्यापारी यांना ईडीच्या नावे धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी आतापर्यंत शेकडो कोटी जमा केले आहेत. त्यातील किती टक्के ईडीला गेले हे ते बाहेर सांगत असतात. किरीट सोमय्या आणि त्यांचा बिल्डर मित्र अमित देसाई यांनी जमिनीच्या मालकाला ईडीच्या नावे धमकी देऊन १०० कोटींचा प्लॉट मातीमोल भावात आपल्या नावे करुन घेतला. त्यातील १५ कोटी रुपये किरीट सोमय्यांनी ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला नेऊन दिले हे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट करावे नाहीतर मी नाव जाहीर करणार असल्याचा इशाराही देत ईडीच्या नावे काय सुरु आहे हे देशाला कळलं पाहिजे असेही ते म्हणाले.
किरीट सोमय्या तपास अधिकारी नाहीत. मी एक जबाबदार माणूस आहे. भाजपाने ते जबाबदार माणूस असल्याचे आणि त्यांच्या आरोपांशी सहमत असल्याचे जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी भाजपाला यावेळी दिले.
सोमय्यांनी बंगले आहेत का सांगावे, कादगपत्रे दाखवू नका. आता ते कर का भरले यावर आले आहेत. देवस्थानच्या जमिनी, बंगले, बेनामी संपत्ती कुठे आहेत हे माझे प्रश्न आहेत असा सवालही त्यांनी यावेळी दिला.
दूधवाला महाराष्ट्रात येतो आणि सरकारमधून काही लोकांचे पैसे आपल्या धंद्यात गुंतवून सात हजार कोटींचा मालक येतो. अमोल काळे कुठे आहे हे मी आजही विचारतो. आमचा अंत पाहू नका, सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करणार असल्याचा इशाही त्यांनी यावेळी भाजपाला दिला.