मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सर्वसामान्य जनतेला चांगले उपचार मिळावेत यासाठी आपण हजारो रूपये खर्च करतो. परंतु औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरें हे आर्शिवादाने रूग्ण बरे होत असल्याचे जाहीर वक्तव्य केले. त्यामुळे खैरेंच्या वक्तव्याची चौकशी करून जनतेच्या आरोग्यावार कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी खैरेंची मदत घेऊन आरोग्याचे सर्व प्रश्न सोडवावेत आणि त्यांच्या समाजसेवेचा आपण उपयोग करून घ्यावा अशी उपरोधिक सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी करत सामना हे सरकारी मुखपत्र असून मी रोज वाचतो. सरकारच्या योजना फेल होतात हे मला सामनामधूनच कळतं असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेला लगावला.
मागील पाच वर्षात राज्य सरकारने नियम धाब्यावर बसवले. बेछूट पुरवणी मागण्या केल्या जात आहेत. महसुली तुट वाढत चालली आहे. उत्पन्नांची वाढ होती नाही त्यामुळे ही तुट भरून कशी काढणार असा प्रश्न आहे. राज्य कर्जाच्या विळख्यात जात आहे. आज प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ५० हजार रुपयांचं कर्ज झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
पोलिसांच्या सुविधा वाढवल्या गेल्या पाहिजे. पण त्याच बरोबर पोलिसांनाही शिस्त लावणे गरजेचे आहे. हरसूल कारागृहात एका तरुणाला प्रचंड मारहाण केली काल पुण्यात मुकबधीरांवर लाठीचार्ज केला. पोलिसांना समज दिला पाहिजे की तुम्ही रक्षक आहात बक्षक नसल्याचे त्यांनी सांगितले.
देशात आदिवासी कुटुंब आज अडचणीत आहे. त्यांना त्यांच्या वन जमिनीपासून वंचित ठेवले जात आहे. त्यांना हिसकावून लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. शासनाला विनंती आहे. केंद्राशी बोलणी करून त्या ११ लाख आदिवासी कुटुंबांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आघाडी सरकारने मुंबईत इंटरनॅशनल फायनान्स सेंटर मंजूर केले होते आता तिथे बुलेट ट्रेन आणली जात आहे आणि हा इंटरनॅशनल फायनान्स सेंटर गुजरातला हलवले. केंद्र सरकारने अधिवेशनात सांगितले की आता दुसरे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर बनवले जाणार नाही. मुंबई हे केंद्र आहे त्यामुळे सरकारच्या या रणनीतीमुळे मुंबईचे महत्त्व कमी केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.