मुंबईः प्रतिनिधी
कोकणातील नाणार प्रकल्प होणे गरजेचे असून या प्रकल्पामुळे कोकणातील लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र या गोष्टीचा विचार न करता वालमने उठविलेल्या हाळीवर नारायण राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोणाचा विरोध मोठा या स्पर्धेतून या प्रकल्पास विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नारायण राणे आणि शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या निमित्ताने खरोखरच आभाळ पडलेय की पान पडलेय असा टोला लगावत येथील जनतेचे जनमत घेण्याची मागणी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली.
नाणार प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र कोकणात सध्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने येथील जनता मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत होत असल्याने जमिनीची विक्रीही मोठ्या प्रमाणावर मागेल त्या किंमतीला होत आहे. नाणारच्या प्रकल्पामुळे येथील स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होवून येथील स्थलांतर होणारी जनता थांबेल असा विश्वासही त्यांनी यावेळी केला.
या प्रकल्पाच्या जमिन अधिग्रहणात वालम नामक एका व्यक्तीचे फक्त मंदीर जाणार असल्याने त्याने जमिनी जाणार असल्याची हाळी दिली. त्या हाळीला भुलून नारायण राणे आणि शिवसेनेनेही विरोध करण्यास सुरुवात केली. वास्तविक ससाच्या पाठीवर पान पडले आणि त्याने हाळी देत आभाळ पडल्याचे गावभर सांगत सुटला. तशीच परिस्थिती नारायण राणे आणि शिवसेनेची झाली असल्याने या दोघांनीही पान पडले की आभाळ पडले याची खातरजमा करावी अशी मागणीही केली.
तसेच मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करू नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.