भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतीच द वायर या संकेतस्थळासाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेसंदर्भात गौप्यस्फोट केला. तसेच जम्मू काश्मीरच्या राज्यपाल पदी असताना दोन फाईलींवर सही करण्याचे ३०० कोटी रूपयांची लाच देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर सीबीआयने मलिक यांना नोटीस पाठवित चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. तर आज सकाळपासून सत्यपाल मलिक आणि त्यांना भेटायला आलेल्या किसान सभेच्या शिष्टमंडळालाही अटक करण्यात आल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल झाली. त्यानंतर अखेर दिल्ली येथील आर.के.पुरम येथील पोलिसांना यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले.
सत्यपाल मलिक यांची मुलाखतीचा व्हिडिओ प्रसिध्द झाल्यानंतर तातडीने सीबीआयकडून मलिक यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस सीबीआय़ने बजावली. तसेच काल भारतीय किसान युनियनचे शिष्टमंडळ मलिक यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी सत्यपाल मलिक यांच्या घरी जाऊन त्यांच्या पाठिशी असल्याचे जाहिर केले. त्या शिष्टमंडळात खाप पंचायतीचे काही नेतेही होते. मलिक यांच्या समर्थनार्थ आर.के.पुरम येथे भारतीय किसान युनियनकडून आंदोलन करण्यात येणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारत काही किसान युनियनच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, सत्यपाल मलिक हे आर.के.पुरम येथील पोलिस ठाण्यात पोहोचल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे मलिक आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यत घेतल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसारीत झाले. अखेर दिल्ली पोलिसांनी सत्यपाल मलिक आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेवून स्थानबध्द किंवा अटक केली नाही. ते स्वतंत्र आहेत, मलिक हे स्वतःहून पोलिस स्टेशनला आले ते स्वतःहून जावू शकतात अशी माहिती दिल्याचे वृत्त हिंदूस्थान टाईम्स या इंग्रजी वर्तमान पत्राच्या संकेतस्थळाने दिले.