मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून महाराजांचा घोर अवमान करणारा श्रीपाद छिंदम सरकारच्या छुप्या पाठिंब्यामुळेच निवडणूक जिंकला असून त्याचा विजय शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारा आहे. अशी कठोर प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, संघ विचारधारा कायम शिवरायांचा द्वेष करत आली आहे. याच विचारधारेतून चाललेल्या सरकारची शिवरायांच्या विरोधातील व पेशवाईचा उदो उदो करणारी मानसिकता वेळोवेळी दिसून आली आहे. श्रीपाद छिंदमला मिळालेले पोलिसांचे संरक्षण तसेच त्याला तडीपार न करणे आणि त्याच्या भावाला राजरोसपणे EVM ची पूजा करून देणे. यातून सरकारला छिंदम बद्दल असलेली सहानुभुती स्पष्ट दिसून येते. स्थानिक पातळीवर प्रशासनाने जाणिवपूर्वक बोटचेपी भूमिका घेत छिंदम समर्थकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.