२२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधत भाजपाचे आणि भाजपाशी संबधित विविध संघटनांचे कार्यकर्त्ये प्रत्येक नागरिकांच्या घरी जात अक्षता वाटप करत त्या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आव्हान जनतेला करत आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, येत्या २२ जानेवारी रोजी देशभर दिवाळी साजरी करायची असेल तर देशील दारिद्रय रेषेतील गरिबांना प्रत्येकी एक हजार रुपये द्यावेत अशी खोचक सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी देशभरात जोरदार सुरु आहे. त्यासाठी देशभरात निमंत्रण देण्याची लगबग सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना २२ जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाचा संदर्भ घेत प्रकाश आंबेडकर यांनी या मागणीच्या माध्यमातून देशातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांकडे पंतप्रधानांचे लक्ष्य वेधले.
प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मला येणार असल्याचं मी वर्तमानपत्रातून वाचत असून त्याची मी वाट पाहतोय. मोदींनी २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. यापूर्वी मोदींनी टाळ्या वाजवण्याचं, थाळ्या वाजवण्याचं केलेलं आवाहन आम्ही मान्य केलं आहे. आता दिवाळी साजरी करण्याचं आम्ही मान्य करतो. फक्त मोदींना आमची एवढीचं विनंती आहे की, जी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबं आहेत त्यांना मोदींनी १-१ हजार रुपये द्यावेत, जेणेकरुन ते दिवाळी साजरी करु शकतील असा खोचक टोला ही लगावला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबं आहेत त्यांना जर त्यांच्याच पैशांनी दिवाळी साजरी करायची असेल किंवा त्यांनी दिवाळी साजरी केलीच तर त्यांना आपल्या मुलांना गोडधोड खाऊ घालण्यासाठी दोन-तीन ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील. म्हणून पंतप्रधानांची इच्छा असेल की २२ तारखेला देशभरात दिवाळी साजरी झाली पाहिजे तर त्यांनी १ हजार रुपये द्यावेत अशी मागणीही केली.