हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक वक्तव्य केले. त्यावरून भाजपाने संभाजी महाराज हे धर्मवीर होते. त्यांना मतांसाठी धर्मनिरपेक्षवादी ठरवू नका असे सांगत भाजपाने अजित पवार यांनी सदर वक्तव्यावरून माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केली. या हिंदवी स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी बाईंसाहेब यांनी केले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, हे निश्चित आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं सुद्धा रक्षक केलं, हे कोणीही नाकारू शकत नसल्याचा दावा केला.
माजी खासदार तथा स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संभाजी महाराज हे स्वराज्याचे आणि धर्माचे रक्षक तसेच धर्मवीर आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे विधान केलं, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कोणत्याही बाबतीत अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून, अर्धसत्य बोलले आहेत. स्वराज्यरक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मवीर नव्हते हे विधान साफ चुकीचं आहे, असल्याचेही ते म्हणाले.
माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहिल की इतिहासाच्या बाबत, करण्यात येणारी विधान बरोबर नाहीत. इतिहासकारांनी केलेल्या विश्लेषणाचं आपण आत्मचिंतन करायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एवढा मोठा इतिहास आपल्याकडे आहे. तरीही तुम्ही विकृत काहीतरी बोलून वाद निर्माण करता. हे जबाबदार पुढाऱ्यांना शोभत नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अजित पवार काय म्हणाले, संभाजी महाराजांबद्दल
हिवाळी अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. पण, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.