मुंबई : प्रतिनिधी
न्या. लोया यांच्या निधनावरून राजकीय कारस्थान करण्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा डाव सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उघड झाला असून राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये गुरुवारी केली.
रावसाहेब पाटील- दानवे पुढे म्हणाले की, या विषयावरून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तसेच सुमारे दीडशे खासदारांसोबत राष्ट्रपतींकडे जाऊन संशयाचे वातावरण निर्माण केले होते. राहुल गांधींनी या विषयात घाणेरडे राजकारण केल्याचा आरोप करत हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले आहे. त्यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बदनामीचे कारस्थान केल्याबद्दल आणि न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा काँग्रेस पक्षाला रोखता येत नाही. त्यामुळे राहुल गांधी व त्यांचे सहकारी विकासाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी खोटेनाटे आरोप करत आहेत. जनता अशा आरोपांना बळी पडणार नाही आणि भाजपाही विकासाच्या मुद्द्यावरून दूर जाणार नाही. राहुल गांधी राजकारणात अपयशी ठरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा पुन्हा निवडणुकांमध्ये पराभूत होत आहे. त्यामुळे हताश होऊन ते न्यायालयाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांचे पितळ उघडे पडल्याचा राजकिय टोलाही त्यांनी लगावला.