Breaking News

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस असल्याचे स्पष्ट करणारे ठरले आहे. जनता भाजपाच्या जुमलेबाजीला बळी पडली नाही, १० वर्षांच्या अन्याय काळ ला जनतेने मतपेटीतून उत्तर दिलेले आहे. भाजपा दक्षिण व मध्य भारतात साफ तर उत्तर व पूर्व भारतात हाफ झाली असून उर्वरित टप्प्यातही हाच ट्रेंड कायम राहिल. नरेंद्र मोदी सरकार हे आता शेवटच्या काही दिवसांचे पाहुणे असून ४ जूननंतर देशात काँग्रेस इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसच्या मीडिया विभागाचे चेअरमन जयराम रमेश यांनी व्यक्त केला आहे.

अमरावती येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा ४०० पार चा नारा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हटवणे व आरएसएस व मोदींचे संविधान आणण्यासाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तसे स्पष्टपणे सांगण्याची हिंमत नाही म्हणून त्यांचे बगलबच्चे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. सामाजिक न्याय हा संविधानाचा मुळ सिद्धांत आहे आणि यालाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुरुवातीपासून विरोध आहे. लोकसभेची ही लढाई विचारधारांची आहे, यात काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीचे मित्र पक्ष हे संविधान वाचवण्यासाठी एकत्र येऊन लढत आहेत. भारतीय जनता पक्षाने अजित पवार, अशोक चव्हाण व प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व आज त्यांनाच भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ करून बाजूला बसवत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभाग विरोधकांच्या मागे लावून त्यांना धमकावण्यात येत आहे.

जयराम रमेश पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली व या यात्रेतून ५ न्याय व २५ गॅरंटी बनवन्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व एमएसपी कायदा बनवणे, केंद्र सरकारची रिक्त ३० लाख पदे भरणे, संविधानात दुरुस्ती करून आरक्षणाची ५० टक्यांवरील मर्यादा हटवणे, गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देणे अशा महत्वाच्या गॅरंटी आहेत. या गॅरंटी काँग्रेस पक्ष देशभरातील ८ कोटी कुटुंबापर्यंत पोहचवणार असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदी मुलाखतींमध्ये व भाषणात सर्व गोष्टींवर बोलतात पण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, चीनचे आक्रमण यावर बोलत नाहीत. देशाची जनता मोदींच्या जुमल्यावर आता विश्वास ठेवणार नाही. २००३ मध्ये काँग्रेस पक्ष राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणूक हरला पण त्यांनतर २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाजपेयी सरकारचा पराभव करुन काँग्रेस आघाडी सत्तेत आली होती. यावेळीही २००४ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषेला काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर, अमरावती लोकसभेचे उमेदवार आ. बळवंत वानखेडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार विरेंद्र जगताप, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बब्लू देशमुख, प्रवक्ते एड. दिलीप एडतकर, भैय्या पवार आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *