मुंबईः प्रतिनिधी
भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपा व संघ परिवाराकडून महात्मा गांधींबद्दल वारंवार अशी अपमानजनक वक्तवे केली जात असताना त्यांना भाजपचे शिर्षस्थ नेतृत्व पाठीशीच घालत असल्याचे दिसते. हेगडेंचे आजचे वक्तव्यही संतापजनक आणि निषेधार्ह आहे. या वक्तव्यप्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या वक्तव्यातून हेगडेंची बौद्धीक दिवाळखोरीच दिसून येते. ब्रिटिशांची दलाली करून स्वातंत्र्य लढ्याला विरोध करणाऱ्यांना स्वातंत्र्य लढा नाटक वाटू शकतो. यांच्या पूर्वजांनीही ब्रिटिशांशी हात मिळवून स्वातंत्र्यलढ्याला कायम विरोधच केला, हे खरे भाजपाचे रूप आहे. पिढ्यान पिढ्य़ा ज्या विचारांनी महात्मा गांधींना विरोध केला, त्यांनाच आता महात्मा गांधी प्रातःस्मरणीय झाले आहेत हेही, खरे नाटक, आणि ढोंगच आहे. एकीकडे महात्मा गांधींना प्रातःस्मरणीय आहेत असे दाखवायचे आणि दुसरीकडे याच प्रवृत्ती त्यांच्याबद्दल हीन दर्जाची वक्तव्य करतात हे थोतांड आता उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाने स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीबद्दल बोलावे हेच मोठे नाटक आहे. ब्रिटिश साम्राजाविरोधातील स्वातंत्र्यलढ्यात लाखो लोकांनी योगदान दिले, संपुर्ण आयुष्य स्वातंत्र्याच्या लढाईसाठी खर्ची घातले. त्यावेळी हेगडे व त्यांचे पूर्वज ब्रिटीशांची गुलामगिरी करण्यात धन्यता मानत होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नाटक म्हणून त्याची अवहेलना करुन अनंतकुमार हेडगे यांनी संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचाच अपमान केल्याची टीका त्यांनी केली.
आशिष शेलार यांची भाषा भाजपची ‘संस्कृती’च दर्शवते !
एनआरसीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका करताना भाजपाचे नेते व माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी वापरलेल्या शब्दांवर थोरात यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याबद्दल बोलताना आदराने बोलणेच योग्य व परंपरेला धरून आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल विरोध असणे समजू शकतो, परंतु त्याला विरोध करताना एकेरी भाषा वापरणे, बाप काढणे हे अयोग्य आहे. शेलार यांची भाषा पाहता ती भाजपाच्या संस्कृतीचाच एक भाग असल्याचा टोला लगावून शेलार यांना लगावला.
Tags anantkumar hegade ashish shelar balasaheb thorat bjp congress mahatma gandhi
Check Also
पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ
दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक …