मागील दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूर धुमसत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट देण्याऐवजी अमेरिका, फ्रांस आणि मुस्लिम राष्ट्राच्या दौऱ्यावर गेले. मात्र मणिपूरबद्दल चकार शब्द काढला नाही. त्यातच संसदेच्या पावसाळी अधिवेशाच्या तोंडावर मणिपूर येथील दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून भारतासह विदेशातून मोदी सरकारवर टीका करण्यात येवू लागली. यासगळ्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी या हिंसाचारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारचे याप्रकरणी स्विकारलेले मौन या गोष्टींना जबाबदार धरले आहे.
तिरुवनंतपुरममध्ये जारी केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री पिनरई विजयन म्हणाले की, देशातील धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की, संघ परिवाराच्या अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अजेंड्यामुळे मणिपूरचं दंगलग्रस्त भूमीत रुपांतर झालं आहे. संघ परिवाराकडून तिथे द्वेषाची पेरणी केली जात आहे. दंगलीच्या नावाखाली मणिपूरमध्ये ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य केलं जात आहे. ख्रिश्चन आदिवासी समुदायाच्या चर्चवर हल्ले केले जात आहेत.
पिनराई विजयन पुढे म्हणाले, मणिपूरमधून दररोज नवनवीन धक्कादायक घटना समोर येत आहेत. मानवी सदसद्विवेक बुद्धीला लाजवणारे अत्यंत भयानक दृश्य मणिपूरमधून वारंवार समोर येत आहे. हिंसाचाराच्या सुरुवातीच्या दिवसांचे काही दृश्य आता समोर आली आहेत. कुकी समुदायातील महिलांना हिंसक जमावाने अत्यंत घृणास्पद आणि क्रूर पद्धतीने वागणूक दिली.
तसेच पुढे बोलताना पिनराई विजयन म्हणाले, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे लोक कर्तव्य बजावत आहेत, तेच लोक हिंसाचाराला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचं मौन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आता उघडा पडत आहे. जातीय ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना पराभूत करणं, ही लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची जबाबदारी आहे, असं मतही व्यक्त केले.