महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱ्या ६ जागांसाठी निवडणूक जाहिर झाली आहे. या निवडणूकीत काहीही करून महाविकास आघाडीने आपला चवथा तर भाजपाने तिसरा उमेदवाराची जागा जिंकायचीच असा निश्चय केल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीर भाजपाचे केंद्रीय निवडणूक निरिक्षक अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर बोलताना भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या संजयचा पराभव अटळ असल्याचे सूचक वक्तव्य केले.
मात्र राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातील एक म्हणजे संजय राऊत तर दुसरे आहेत कोल्हापूरचे शहरप्रमुख संजय पवार मात्र आशिष शेलार यांनी नुसते संजय असे नाव घेतल्याने शेलार यांनी नेमक्या कोणत्या संजय बद्दल वक्तव्य केले. हे समजायला मार्ग नाही.
रेल्वे मंत्री आणि निवडणूक निरिक्षक अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत भाजपाची आज बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्हिडीओ काँन्फरन्स व्दारे सहभागी झाले तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री आणि उमेदवार पियुष गोयल यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले होते.
निवडणूकीची पुर्ण आणि पुर्व तयारी झाली असून सर्व रणनिती, कार्यपद्धतीची ब्लू प्रिंट तयार आहे. भाजपचा तिसऱा उमेदवार जिंकणारचं शिवसेनेच्या संजय चा पराभव होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी दाखविला.
रोज सकाळी उठून बोलणाऱ्या खा. संजय राऊत यांचे बोलणे हे बालिशपणाचे आणि पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित स्वपक्षाचा पराभव दिसत असेल. त्यामुळे ते असे बोलत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरातील त्यांचे आमदार त्यांनी व्यवस्थित सांभाळले तरी खुप आहे असा टोलाही त्यांनी कोल्हापूरचे सतेज बंटी पाटील यांना लगावला.
आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप त्यांनी केले आहे. ही वेळ त्यांच्यावर का येते? जे आमदारांवर अविश्वास दाखवतात तेच लोकशाहीवर बोलत आहेत. आमदारांवर एवढा अविश्वास? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
राज्यसभा निवडणूकीकरीता काँग्रेस १, राष्ट्रवादी १ आणि शिवसेनेचे २ असे मिळून महाविकास आघाडीकडून चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर भाजपाने पहिल्या यादीत दोघांना उमेदवारी दिली असून काही वेळानंतर धनंजय महाडीक यांच्या रूपात तिसरा उमेदवार दिला आहे.
वास्तविक पाहता भाजपा आणि महाविकास आघाडीला अतिरिक्त मतांची गरज आहे. यापार्श्वभूमीवर अपक्ष आणि छोटे पक्ष असलेल्या आमदारांना भेटून मतांची जमवाजमव सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करताना असलेल्या बहुमताचा विचार केला चवथ्या उमेदवारासाठी तर फार तर चार मतांची आवश्यकता लागणार आहे. तर भाजपाला त्यांच्या तिसऱ्या उमेदवारासाठी तब्बल १४ मतांची आवश्यकता लागणार आहे. ही अतिरिक्त मते मिळविण्यासाठी या दोघांकडून सध्या आमदार आणि छोट्या पक्षांना मनविण्याचे काम सुरु आहे.