मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्रासह देशात फक्त कोरोना आजारामुळे होत असलेल्या जीवीतहानी आणि वित्तहानीवर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रयत्न करत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मारहाणप्रकरणी सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. मात्र आता आव्हाड यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्यास सांगावे आणि तसे आदेश दिले की नाहीत याबाबत दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चौकशी करावी अशी अजब मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजबच मागणी केली. त्यामुळे त्यांच्या या मागणीची दखल घ्यावी की त्यावर हसावे असा प्रश्न राजकिय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
वाचू या त्यांच्याच कार्यालयाक़डून प्राप्त झालेल्या प्रसिध्दीपत्रकाची प्रत्र
ठाणे शहरातील एका तरुणाला राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात नेऊन जबर मारहाण केल्याच्या आरोपाची निःपक्ष चौकशी होण्यासाठी आव्हाड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आव्हाड यांना सूचना दिली का, याची त्यांच्याकडे चौकशी करावी, अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली.
ठाण्यातील अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जनतेचा लोकशाहीवरील विश्वास टिकण्यासाठी याप्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सहभागाचा आरोप होत असल्याने निःपक्ष चौकशीला बाधा येऊ नये यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे गरजेचे असून त्यानुसार त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना द्यावी आणि राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी अशी सूचना दिली का याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणाच्या बातम्यांनुसार पोलीस करमुसे यांच्या घरी गेले व त्यांना सोबत येण्यास सांगितले. पोलिसांनी त्यांच्या संसधनांचा वापर करून करमुसे यांचा शोध घेण्यास त्यांना कोणी व का सांगितले याचा शोध घेण्याची गरज आहे. तसेच, पोलिसांनी करमुसे यांना त्यांच्या सोबत पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले पण त्यांच्याविरोधात कोणता गुन्हा दाखल झाला आहे, हे सांगितले नाही, असेही वृत्त आहे. पोलिसांनी करमुसे यांना पोलीस स्टेशनला नेण्याच्या ऐवजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात का नेले, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मारहाण झाल्यानंतर करमुसे यांना नेण्यास पोलिसांना सांगण्यात आले, असे बातम्यात म्हटले आहे तर पोलिसांनी करमुसे यांना कोठून ताब्यात घेतले, आव्हाड यांच्या बंगल्यातून की जवळच्या परिसरातून याचीही चौकशी गरजेची आहे.
या प्रकरणात विविध एफआयआर दाखल झाले आहेत. तसेच या प्रकरणी उपस्थित होणाऱ्या विविध प्रश्नांची निःपक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना देणे आवश्यक आहे. त्यांनी तशी सूचना दिली आहे का, याची चौकशी राज्यपालांनी करावी, अशी विनंती मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.