मुंबई : प्रतिनिधी
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त मोफत तांदूळ ३ एप्रिलपासून टप्या-टप्याने देण्यात येत आहे. या योजनेसाठी ३ लाख ५० हजार ०८२ मे.टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून १ ते ७ एप्रिल २०२० या सात दिवसात राज्यातील ९० लाख ०२ हजार ८६८ शिधापत्रिकाधारकांना तब्बल २२ लाख ८३ हजार १८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहेत. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु. किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु. किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात या योजनेमधून सुमारे १२ लाख ५२ हजार ३५० क्विंटल गहू, ९ लाख ७५ हजार १४४ क्विंटल तांदूळ, तर ११ हजार ५०३ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख २३ हजार ७१५ स्थलांतरित शिधापत्रिका धारकांनी ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी पोर्टेबिलिटी योजनेनुसार अन्नधान्य घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.