मुंबई : प्रतिनिधी
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल असलेले काँग्रेसचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यापाठोपाठ आता त्यांचे कुटुंबियांनाही लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालायाने दोषमुक्त ठरवलेले आहे. त्यामुळे राज्याच्या विशेषत मुंबईच्या राजकारणात कृपाशंकर सिंह हे पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली संशयाच्या भोवऱ्यात आणलेल्या व्यक्ती भाजप काळात निर्दोष सुटत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.
न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह आणि सून अंकिता यांनाही आज न्यायालयाने क्लीन चीट दिली.
काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणावरून काँग्रेसचे नेते गुरूदास कामत यांच्या गटाने मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे त्याकाळी सिंह यांच्या विरोधात सर्व प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर अनेक गुप्त माहिती उघडकीस येत होती. यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या लाच लुचपत विभागाने गुन्हा नोंदवित त्यांच्या मालमत्ता काही काळासाठी जप्तीची कारवाई केली होती.
तसेच याप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चार महिन्यापूर्वी न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि आर्थिक गुन्हे विभागाने २०१५ मध्ये कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गेल्या फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त केले होते. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र ती घेतली न गेल्याने त्यांना दिलासा मिळाला होता.