मुंबई : प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दुष्काळी मदत जाहीर करण्याच्या प्रश्नावरून विरोधकांनी आंदोलन केले. विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी विरोधकांकडून प्यायला नाही पाणी सरकारची फक्त आश्वासनांची वाणी, विठ्ठला विठ्ठला…मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण देण्याची सुबुध्दी दे, दुष्काळग्रस्तांना शेतकऱ्यांना ५० हजाराची मदत जाहीर करा, वा रे फडणवीस तेरा खेल…सस्ती दारु महंगा तेल… फडणवीस सरकार होशमें आओ…घरपोच दारु देणाऱ्या सरकारचा निषेध असो…मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पहिल्याचदिवशी पटलावर ठेवा… अशा घोषणा विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत सरकारला कसे ‘सळो की पळो’ करुन सोडणार याची चुणूक दाखवून दिली.
यावेळी घोषणाबाजी करतानाच ठग्ज ऑफ महाराष्ट्र असे पोस्टर फडकवून सरकारचा निषेधही नोंदवला गेला.
शिवसेनेचेही आंदोलन
ठाणे जिल्ह्यातील मलंगगड परिसरात लोकसहभागातून लावण्यात आलेली १ लाख झाडे जाळण्यात आली. एकाबाजूला राज्य सरकार पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावण्याचे काम करत असताना दुसऱ्याबाजूला याच सरकारच्या वनविभागाकडून लावलेली झाडे जाळण्यात आली. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे यामागणीवरून शिवसेनेच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या आवारात आंदोलन केले.