अयोध्या: मराठी ई बातम्या.कॉम टीम
साधारणत: २८ वर्षापूर्वी अर्थात १९९२ साली अयोध्येतील सुप्रसिध्द बाबरी मस्जिद भाजपा-शिवसेनेच्या नेतृत्वाखालील कारसेवकांनी पाडल्याचे दृश्य त्यावेळच्या देशातील सर्व जनतेने पाहिले. तसेच मस्जिदीच्या परिससरापासून काही अंतरावर भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, स्व.प्रमोद महाजन यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या अनेक नेत्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेनंतरच बाबरी मस्जिद पाडण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या कारसेवकांनी मोर्चा वळविल्याचे स्पष्ट असताना मात्र सीबीआय न्यायालयाने या अनुषंगाने सादर करण्यात आलेले सर्व पुरावे ठोस नसल्याचे सांगत मस्जिद पाडण्याचा कट पूर्व नियोजित नव्हता असे स्पष्ट करत याप्रकरणी ४८ जणांना निर्दोष सोडून देण्याचा निर्णय आज दिला.
या प्रकरणी सीबीआयने ६०० कागदपत्रे आणि ३४१ जणांचे जबाब नोंदविले. त्याचबरोबर याप्रकरणी ४८ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. मात्र यातील या खटल्याच्या कालावधित १६ जण मृत्यूमुखी पडले.
सुरूवातीला न्यायालयाने या सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती, कल्याण सिंग, सतीश प्रधान, महंत नृत्यगोपाल दास यांना प्रकृती अस्वस्थामुळे गैरहजर राहण्यास परवानगी दिली. यांच्याशिवाय २६ आरोपी न्यायालयात हजर होते.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात रेड अर्लट जारी करण्यात आला होता. तर अयोध्येत जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.