मुंबई: विशेष प्रतिनिधी
नुकताच १० वी परिक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर ज्या वेबसाईटवरून निकाल जाहिर ती वेबसाईटच ५ ते ६ तास बंद पडल्याने विद्यार्थी-पालकांना सोसाव्या लागलेल्या मनस्तापानंतर आता ११ वी प्रवेशासाठी सीईटीची परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट कालपासून बंद पडल्याची नवी माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण संचालक दिनकर पाटील यांना उत्तर द्यायला वेळच नसल्याची धक्कादायक बाबही पुढे आली आहे.
१० वीचा निकाल झाल्यानंतर ११ वी प्रवेशासाठी सीईटीची परिक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. तसेच सीईटी परिक्षेचा पर्याय ऐच्छिक असला तरी चांगल्या महाविद्यालयात आणि आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे सोपे व्हावे यासाठी अनेकजण सीईटी परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु या परिक्षेसाठी सुरु करण्यात आलेली वेबसाईटच काल २० जुलै २०२१ पासून बंद पडली असल्याने विद्यार्थ्यांनां अर्ज भरायचा कसा ? असा प्रश्न पडला आहे.
यासंदर्भात अनेक विद्यार्थी-विद्यार्थींनी मराठी ई-बातम्या.कॉमशी संपर्क साधून आपल्या व्यथा मांडल्या असून एक तर १० वी ची परिक्षा झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या धोरणानुसार मुल्याकंन करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. मात्र या मुल्याकंनात अपेक्षित गुण मिळालेले नाहीत. त्यामुळे सीईटी परिक्षा दिल्यानंतर आमचे गुणात्मक दर्जा वाढेल आणि चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यास सोपे जाईल या उद्देशाने आम्ही कालपासून शिक्षण विभागाने जाहिर केलेल्या वेबसाईटवर जावून अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र वेबसाईट बंद असल्याचा मेसेज त्यावर पाह्यला मिळाला असल्याचे एका १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने सांगितले.
११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परिक्षा २१ ऑगस्ट २०२१ ला होणार आहे. परंतु वेबसाईटच बंद असल्याने मुलांचा अर्ज कधी भरणार? असा सवाल एका पालकाने करत शिक्षण विभागाचा गोंधळ हा कायमचाच असून खरेतर आपल्या चुकांमधून शिक्षण विभागालाच नव्याने शिक्षण देण्याची गरज असून शिक्षण विभागाच आपल्या चुकांमधून शिकणार नसेल तर विद्यार्थ्यांच्या संभावित नुकसानीला शिक्षण विभागालाच जबाबदार धरावे लागेल असे मतही या पालकाने व्यक्त केले.
यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.