Breaking News

राहुल गांधींचा सवाल, अदानी- मोदींचे नाते काय, चीन प्रश्नी मोदींच्या मंत्र्याने दाखवली ती देशभक्ती? संसदीय समितीमार्फत चौकशी का केली जात नाही

काही दिवसांपूर्वी लोकसभेत मी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्योगपती अदानी यांच्यासोबतचा विमानातला फोटो दाखवित नरेंद्र मोदी यांचे अदानी सोबतचे नाते काय ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर भाजपाचे सगळे मंत्री आणि खासदार बचावासाठी उभे राहिले. अदानी इतका मोठा देशभक्त आहे का? की त्याच्या बचावासाठी भाजपाचे सगळे खासदार-मंत्री उभे राहिले असा खोचक सवाल करत देशाची सगळी संपत्ती एका व्यक्तीने लुटल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

चीनसोबत का लढू शकत नाही असा सवाल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केला तर ते म्हणाले, चीनची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा मोठी आहे. त्यामुळे आपण त्यांच्याशी लढू शकत नाही हीच का देशभक्ती? ही तर सावरकर नीती अशी खोचक टीकाही राहुल गांधी यांनी केली.
रायपूर येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी राहुल गांधी बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, देशात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात येऊन देशाची संपत्ती लुटली, आता अदानी हेच करत आहेत. अदानी समुहावर टीका करणाऱ्यांना भाजपा देशद्रोही ठरवत आहेत. मग, अदानी सर्वात मोठे देशभक्त आहेत? भाजपा-संघ अदानींना बचाव का करत आहे? अदानींच्या बेनामी कंपन्यांमार्फत हजारो कोटींचा पैसा भारतात आणला जातो. अदानी समूह संरक्षण क्षेत्रात काम करतो, मग मोदींना त्यांच्या बेनामी कंपन्यांची माहिती नाही? ही देशाच्या सुरक्षेशी निगडीत गंभीर बाब असताना संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी का केली जात नाही, असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करत अदानी प्रकरणातील सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही महाअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दिला.

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या चीनसंदर्भातील विधानांचेही राहुल गांधींनी वाभाडे काढले. चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी असल्याने भारताला चीनविरोधात लढता येत नाही, असे विधान जयशंकर यांनी मुलाखतीत केले होते. त्यावर, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था मोठी असेल तर त्याविरोधात लढायचे नाही का? मग, इंग्रजांविरोधातही आपल्याला लढता आले नसते? मोदी सरकारमधील मंत्रीच म्हणतात, भारत चीनविरोधात लढू शकत नाही. हा तर भ्याडपणा झाला. हीच का मोदी सरकारच्या मंत्र्यांची देशभक्ती? ताकदवानासमोर मान तुकवायची आणि कमकुवत असलेल्यांशी लढायचे, ही तर सावरकरांची विचारसरणी झाली असा खोचक टोला लगावत महात्मा गांधींनी ‘सत्याग्रहा’चा मार्ग दाखवला होता, भाजपा-संघ तर ‘सत्ताग्रही’ आहेत, ते सत्तेसाठी काहीही करू शकतील, चीनशी हातमिळवणी करू शकतील, त्यांच्यापुढे वाकतील, अशी टीका राहुल गांधींनी केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *