मुंबई: प्रतिनिधी
आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दिले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे लगेच मागे घेण्याची कार्यवाही करावी असे निर्देश गृह विभागास दिले.
शहरात होत असलेल्या मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे जंगलातील झाडे तोडणाचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत ती झाडे रात्रीच्या अंधारात तोडली. त्यावेळी पर्यावरण स्नेहींनी त्या झाड्यांचे प्राण वाचविण्यासाठी आंदोलन करत झाडे तोडण्यास विरोध केला. त्यामुळे या आंदोलनकर्त्यांवर फडणवीस सरकारने गुन्हे दाखल केले. ते गुन्हे आज मागे घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे पर्यावरणीय कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला.
प्रस्तावित कारशेडसाठी आरेच्या जंगलातील २२०० झाडे तोडावी लागणार होती. ही झाडे तोडली गेल्यास मुंबईच्या पर्यावरणास हानी पोहचणार असल्याने पर्यावरण वादी कार्यकर्त्यांनी त्यास विरोध करत आंदोलनाचे हत्यार उपसले. मात्र तत्कालीन फडणवीस सरकारने या आंदोलनकर्त्यांना चकवा देत रात्रीच्या काळोखात झाडे तोडली. तरीही त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यानी त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले.