मुंबई: प्रतिनिधी
साधारणत: १ महिन्यापूर्वी राज्यातील कोरोनाबाधितींची संख्या पुढील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वाढताना दिसणार असल्याचे भाकित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यास आज बरोबर एक महिना पूर्ण होत असून या कालावधीत कोरोनाग्रस्तांची संख्या चांगलीच वाढताना दिसत असल्याने अजित पवारांचे भाकित खरे होताना दिसत आहे.
२३ जून २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्यावेळी ते म्हणाले होते की, जळगांव, सोलापूर यासह अन्य भागात जी काही रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्या संख्या तेथे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याचे दिसून येते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील नागरिकांनी केंद्र व राज्य सरकार आपल्यापरीने प्रयत्न करत आहे. जनतेने प्रतिसाद दिला नाही आणि मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगची उणीव राहिली तर फार मोठी किंमत मोजावी लागेल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अजित पवार यांनी व्यक्तव्य केलेल्या दिवशी साधारणत: ३२१४ इतकी कोरोनाबाधितांची संख्या होती. त्यानंतर २५ जून रोजी हि संख्या ४८४१ वरून थेट २७ तारखेपासून ५ हजारवर नव्या रूग्णांचे निदान होण्यास सुरुवात झाली. तर २ जुलै पासून ६ हजाराच्यावर आणि त्यानंतर ११ जुलैपासून एखाद्या दुसऱ्या दिवसाचा अपवाद वगळता राज्यात सातत्याने ८ हजाराहून अधिक रूग्णांचे निदान होण्यास सुरुवात झाली. तर काल अर्थात २२ जून रोजी एकदम राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत १० हजार ५७६ नव्या रूग्णांचे निदान झाले. विशेष म्हणजे याकाळात ठाणे, कल्याण-डोंबिवली, सोलापूर, जळगांव, औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यातील बाधितांची संख्या चांगलीच वाढताना दिसत आहे. तत्पूर्वी जून महिन्यात राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ ते ३ हजाराच्या दरम्यान वाढत होती.
त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार जुलै महिन्यात तब्बल २ लाख २ हजार २०९ इतकी महिना भरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तर गेल्या महिन्यात अर्थात २२ जून अखेर हीच संख्या राज्यात ६१ हजार ७९३ इतकी होती. अजित पवारांनी भाकित केल्याप्रमाणे महिना भरात दोन लाखांनी बाधितांची संख्या वाढली आहे. तर ऑगस्ट महिन्यात याच पटीत संख्या वाढेल का अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.