मुंबई : नवनाथ भोसले
वर्ष २०१७ मध्ये भारतीय शेअर बाजारांनी २८ टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे अनेक शेअर्सनी चांगला परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. प्राथमिक समभाग विक्रीसाठीही मागील वर्ष चांगले गेले. या वर्षात ३८ कंपन्यांनी आयपीओमार्फत शेअर बाजारातून ७५ हजार ४७५ कोटी रुपये उभारले आहेत. आयपीओमधूनही गुंतवणूकदारांना चांगला लाभ झाला आहे. चालू वर्षातही शेअर बाजारात आयपीओंची रांग या वर्षी ५० पेक्षा अधिक कंपन्या आयपीओ आणण्यासाठी रांगेत आहेत.
शेअऱ बाजार नियंत्रक सेबीची आयपीओची प्रक्रिया सोपी आणि वेगवान करण्याची योजना आहे. ही प्रक्रिया सोपी बनवून लिस्टिंगचा वेळ कमी करून ४ दिवस करण्याचा सेबीचा प्रयत्न आहे. सध्या हा वेळ ६ दिवसांचा आहे. याचा फायदा कंपन्यांसहीत गुंतवणूकदारांनाही मिळेल. गुंतवणूकदारांना कमी वेळेत आपल्या गुंतवणूकीवर चांगला फायदा मिळेल.
मागील वर्षभरात ३८ कंपन्यांनी आयपीओमधून ७५ हजार ४७५ कोटी रुपये उभारले असून या कंपन्यांनी उभारलेली रक्कम ही मागील दहा वर्षातील एकूण रकमेपेक्षाही अधिक आहे. २०१० साली आयपीओमधून ५९ कंपन्यांनी ३७ हजार ७७० कोटी रुपये उभारले होते. तर २०१६ साली २६ हजार ३७२ कोटी रुपयांचे आयपीओ आले होते.
या कंपन्या आणतील आयपीओ
चालू जानेवारी महिन्यात तीन कंपन्यांचे आयपीओ आणले आहेत. यामध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम्स, न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी आणि अंबर एंटरप्रायझेस इंडिया या कंपन्यांचा समावेश आहे. या तीन कंपन्यांनी ११३६ कोटी रुपये उभारले आहेत. याशिवाय आयसीआयसीआय सिक्युरिटीज, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, कॉन्टिनेंटल वेयरहाउसिंग, एनएसई इंडिया, गो एयरलाईन्स आदी कंपन्यांसहीत ५३ कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत.