मुंबई : प्रतिनिधी
औरंगाबाद दंगलीतील प्रमुख संशयितांचे व्हीडीओ फुटेज पुराव्या दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी, एमआयएम आदी पक्षाच्या पाच मुस्लिम आमदारांनी वेळ मागितला. मात्र मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी भेटीची वेळ नाकारल्याने काँग्रेसचे आमदार आसिफ शेख, अब्दुल सत्तार, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, वारीस पठाण यांनी मंत्रालयाच्या दरवाज्यातच ठिय्या आंदोलन सुरु केले.
काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत किरकोळ कारणावरून दंगल उसळली. त्यात रात्रीच्यावेळी काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजातील जवळपास १०० व्यापाऱ्यांची दुकाने जाळत वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. त्यामुळे शहरात हिंदू-मुस्लिम अशी जातीय दंगल घडण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, या दंगलीत शिवसेनेचा हात असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. तसेच यासंदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेजही सोशल मिडीया साईटवर व्हायरल झाले.
व्हायरल झालेले व्हीडीओ फुटेज घेवून संबधित शिवसेनेच्या हल्लेखोरांवर कारवाई करावी या मागणीसाठी अब्दुल सत्तार, आसिफ शेख, अबू आझमी, इम्तियाज जलिल, वारीस पठाण या मुस्लिम आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे वर्षा या शासकिय निवासस्थानी वेळ मागितली. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे या चार-पाच आमदारांनी मंत्रालयात येवून मंत्रालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन सुरु केले.
अखेर दुपारी २.३० वाजता या आमदारांना रात्री ९ ची वेळ चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आला. त्यानंतर या आमदारांनी आपले ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले.