ठाणे: प्रतिनिधी
“म्युस” व ” ठाणे नागरी प्रतिष्ठान” (ठाणे मतदाता जागरण अभियानची मुख्य संघटना यांनी नागरिकांच्या केलेल्या पाहणीत ७९% नागरिकांनी मेट्रो ४ (कासार-वडवली ते मुंबई) ही अंडरग्राऊंड करा याचा कौल दिला आहे.
मेट्रो ४ जीचे प्रत्यक्ष काम एमएमआरडीए करत आहे त्याचे स्वागत नागरिकांनी फार उत्साहाने केलेले नाही. वाहतुकीचा खोळंबा, वाढते प्रदूषण, जनसूनवाई घेण्याबाबत संदिग्ध निर्णय व रस्त्यावरून जाणारी मेट्रो याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या असून हे कसे स्मार्ट नियोजन असा प्रश्न जनतेच्या मनात उभा राहिला आहे. जनतेच्या हजारो हरकतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला ठाणेकर नागरिकांनी मेट्रो हवी पण ती अंडरग्राऊंड करावी अशी मागणी करून चपराक दिली आहे.
ठाणेकर नागरिकांची या विषयावर के मते आहेत ती जाणून घेण्यासाठी तरुणांच्या “म्युस” संस्था व ठाणे नागरी प्रतिष्ठान च्या मदतीने १००० हजार पेक्षा अधिक नागरिकाचा सर्व्हे केला ज्यात मेट्रो ४ विषयी सर्व प्रश्न विचारण्यात आले होते.
नागरिकांनी दिलेल्या उत्तरातून ठाणेकर आजच्या मेट्रो ४ च्या उभारणीच्या नियोजनाबाबत समाधानी नाहीत हेच स्पष्टपणे समोर आले आहे.
९१% नागरिकांना मेट्रो ४ प्रकल्प होत आहे हे माहीत होते तर ९% नागरिक याबाबत अनभिज्ञ होते.
या ९१% नागरिकांपैकी ७९% नागरिकानी मेट्रो अंडरग्राऊंड हवी असे मत मांडले आहे. १२% नागरिकांनी आहे त्या नियोजनाला पाठींबा दिला.
३४.१% नागरिकांना यात कोणती स्टेशन आहेत व ती कुठे येणार आहेत याची काहीच कल्पना नाही असे सांगितले.
या विशाल व मेगा प्रोजेक्ट बाबत एमएमआरडीए ने जनसूनवाई घेतली याची कोणतीही माहिती जनतेला कळलेली नाही त्यांनी जनसूनवाईचा प्रचार कमी केला याबद्दल ६८.४% नागरिकांनी नाराजी नोंदविली. तसेच आता जर पुन्हा नव्याने ही सुनावणी घेतली गेली तर ८२.४% नागरिकांनी यात सहभागी होऊन आपली मते , हरकती व सूचना मांडू असे सांगितले.
या मेट्रो ४ प्रकल्पात हजारो वृक्ष तोडले जाणार आहेत हा चिंताजनक विषय आहे याबद्दल ८८% नागरिकांनी आपला आक्षेप नोंदवला असून याबद्दल एमएमआरडीए कडे कोणतेही पर्यायी नियोजन नाही याबद्दल आश्चर्य व संताप व्यक्त केला आहे.
६८% नागरिकांनी मेट्रोमुळे वाहतुक सुधारणार असून जॅम होणार नाही व जनतेचा प्रवास सुखकर होईल हा एमएमआरडीए चा दावा चुकीचा आहे असे मत नोंदविले. मेट्रो च्या कामामुळे सध्या प्रचंड वाहतुक कोंडी, प्रदूषण याला नागरिक सामोरे जात आहेत. एमएमआरडीए कडून अधिक चांगले नियोजन होणे अपेक्षित आहे.
असे असले तरी जमिनीवर उन्नत मार्गद्वारे केल्या जाणाऱ्या मेट्रो उभारणीतून वाहतुक कोंडीतून व प्रदूषणातून जनतेची मुक्ती होणार नाही असे ५२% नागरिकांनी सांगितले आहे. कारण वाहतुकी करता उपलब्ध असलेला मार्गच मेट्रो व्यापणार आहे, याकडेही नागरिकांनी लक्ष वेधले आहे. ज्यामुळे भविष्यातही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.
८५% नागरिकांना या पायाभूत प्रकल्पाचा खर्च किती येणार हे माहीत नाही. पण खर्च अवाढव्य असणार याची जाणीव आहे. यातीलच ५८.२% नागरिकांनी या प्रचंड भांडवल गुंतवणुकी पेक्षा कमी खर्चिक असलेली डेडिकेटेड रस्त्यावर चालविली जाणारी बस सेवा हा अधिक प्रभावी मार्ग आहे असे मत नोंदवले.
नुकत्याच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे समोरही हे सर्व प्रश्न मांडण्याचे काम “म्युस” व ” ठाणे नागरी प्रतिष्ठान” च्या वतीने करण्यात आले. तसे एक पत्रही त्यांना पाठविण्यात आले आहे.
या सर्व्हेतून मेट्रो हवी पण ती अंडरग्राऊंड हवी, रस्त्यावरून जाणारी नको हीच मागणी पुढे येत आहे. यावर एमएमआरडीए ने गंभीर विचार करावा व वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची मुक्ती करावी व वाढत चाललेल्या प्रदूषणातूनही ठाणेकरांना आझाद करावे हाच निष्कर्ष निघत आहे.
Tags cm fadnavis ekanath shinde metro-4 myus thane metro thane nagri pratishthan
Check Also
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …