शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सूचना
मुंबई : प्रतिनिधी
जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जवानांसह अनेकजण शहीद झाले. हा हल्ला केवळ दहशतवादी हल्ला नाही, तर हा गुप्तचर यंत्रणेच्या चिंधड्या उडविणारा हल्ला आहे. त्यामुळे आता कोणाला सोडणार नाही, या तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच याचा सोक्षमोक्ष लावा अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.
हल्ल्याबाबत माहितीही मिळत नसेल तर ते काय करतात हा प्रश्न आहे. देशामध्ये उद्वेग आहे, चीड आहे. निषेध करतो आणि पुन्हा कामाला लागतो. निवडणूक असो नाहीतर काहीही, त्याकडे लक्ष न देता पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. संपूर्ण देशात आपण एकवटून सोक्षमोक्ष लागला पाहिजे ही माझी भूमिका असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सूत्र यांच्या हातात असून लोक नेमके काय करतात? त्यांना कळत नसेल तर त्यांना त्या ठिकाणाहून हटवा अशी मागणी करत असे हल्ले दुर्लक्षित करत असू तर त्यांना हटवले पाहिजे.
नुसते दंड थोपटून काही होत नाही. निवडणुका प्रचार जाऊ द्या बाजूला. आधी पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या. सर्जिकल स्ट्राईक हा आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला होता. मात्र आता पाकिस्तानात घुसाव लागेल. सगळा देश सरकारच्या मागे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिले.