Breaking News

संजय राऊत यांचा हल्लाबोल म्हणाले, पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागा

केंद्र सरकारच्या नियंत्रणात असताना एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स या दोन कंपन्याच्या एकत्रिकरणासाठी NACIL या कंपनीने विमान भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या अनियमिततेच्या चौकशीचा अहवालावरील क्लोजर रिपोर्ट २८ मार्चला सादर करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांना क्लीन चीट देण्यात आली. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल चढवित सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भाजपाने यांची माफी मागावी अशी मागणी केली.

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने UPA च्या काळात एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या विलीनीकरणानंतर स्थापन केलेल्या NACIL या कंपनीने विमान भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या कथित अनियमिततेच्या चौकशीचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. कारण ” कोणत्याही चुकीच्या कामाचा पुरावा”, या चौकशीत आढळला नसल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल, हे अजित पवार यांचे समर्थक आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री होते. सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमुळे प्रफुल पटेल गटाला दिलासा मिळाला आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील कथित भ्रष्टाचाराबाबत भाजपाने राडा केला होता. आता याप्रकरणी “भाजपाने डॉ. मनमोहनसिंग यांची माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी केली.

एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या विलीनीकरणानंतर नॅशनल एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NACIL) ची स्थापना झाली. सीबीआयने आरोप केला आहे की हा निर्णय “अप्रामाणिकपणे” घेण्यात आला होता आणि अधिग्रहण कार्यक्रम सुरू असतानाही विमान भाडेतत्त्वावर देण्यात आले होते.

सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये आरोप केला आहे की, भाडेपट्टीचा निर्णय “अन्य अज्ञात व्यक्तींसोबत षड्यंत्र रचून” घेतला गेला, ज्यामुळे खाजगी कंपन्यांना “आर्थिक फायदा” झाला आणि परिणामी “सरकारी तिजोरीचे नुकसान” झाले.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदाबद्दल संजय राऊत म्हणाले की, जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये कोणताही वाद नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा समावेश आहे.

३ एप्रिल रोजी शिवसेना उबाठा पक्षाच्या शिवालय कार्यालयात महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे ३१ मार्च रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर “देशाचे हित आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी” आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या आंदोलनासही उपस्थित राहतील.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *