या लोकसभा निवडणूकीत आमचा प्रयत्न होता की, भाजपाच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजपा विरोधातील मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
मुंबई दादर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान उपस्थित होते.
या वेळी अजेंड्याविषयी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कॉन्ट्रॅक्ट व्यवस्थेत जो कर्मचारी आणि अधिकारी राबलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेता त्यांना ५८ वर्षे वयापर्यंत निवृत्त करायचे नाही असा अजेंडा आमचा ठरत आहे. तसेच, महाराष्ट्रात एकंदरीत १४ लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी आहेत. या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ केली पाहिजे. पाच वर्षांत ती २२ लाखांवर गेली पाहिजे, तेव्हाच शासन व्यवस्थितरीत्या चालू शकते, अशी भूमिकाही यावेळी मांडली.
पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. ज्यांना आम्ही लक्ष्य केले ते संजय राऊत होते. संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात म्हणून आम्ही म्हणालो की, संजय हे आघाडीत बिघाडी करत आहेत. मविआकडून तीन जागांपलीकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही असेही यावेळी सांगितले.
महाविकास आघाडीविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, आम्हाला मविआने तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात एक अकोला आणि दुसऱ्या दोन जागा यापलीकडे आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही.