मुंबई : प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला, तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.
कोकणातील चाकरमान्यांबाबत निर्णय योग्य वेळी घ्या, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज सकाळी मुंबई पोलीस आयुक्तांची ही भेट घेतली. त्यापुर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती. मात्र शासनाने कोणताच निर्णय घोषित घेतला नाही. तसेच ग्रामपंचायतींनी १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतल्याने गेले तीन दिवस चाकरमानी कोकणाकडे जाण्यासाठी धडपड करीत आहे. एक तर ई पास मिळत नव्हते, ज्यांना पास मिळाले त्यांच्या रांगा कशेडी घाट आणि खारेपाटण मध्ये लागल्या होत्या. अन्न, पाण्या शिवाय चाकरमान्यांचे हाल सुरु आहेत. तर आता दोन दिवस प्रवासाचे शिल्लक असताना आज शासनाने निर्णय घोषित केला.
आज पासून एसटीचे बुकिंग सुरु होणार असेल तर मग कसा प्रवास होणार? १० दिवस कोरंटाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला तरी ग्रामपंचायतीने १४ दिवसांचा निर्णय घेतला. त्या विषयी शासनाच्या प्रतिनिधीची स्थानिकांशी चर्चा केली आहे का? रेल्वे गाड्या सोडण्यास तयार होती मग गाड्या का मागण्यात आल्या नाही? एसटीने जाणार त्या़ंना ई पास नाही मग खाजगी गाडीसाठी का? शासनाने १० दिवस कोरंटाईन असे घोषित केले आणि ग्रामपंचायतीने ते मान्य न केल्यास काय करणार? आता एकाचवेळी एसटी आणि खाजगी गाड्या रस्त्यावर आल्यास वाहतूक नियोजनाचे काय? केवळ २५० रुपयात अँटीबॉडी टेस्ट होत असताना चाकरमान्यांच्या या मोफत टेस्ट शासनाने का केल्या नाही?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत . कोकणातील चाकरमान्यांची कोंडीच शासनाला करायची होती. म्हणून आता वरातीमागून घोडं असल्यासारखा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी केला.