मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मात्र यापैकी १५ रूग्ण बरे होण्याच्या मार्गावर असून ही समाधानाची बाब असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देत या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्वधर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन करत जनतेला गुढी पाडव्यानिमित्त नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’, असा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडताहेत, ही गंभीर बाब आहे. राज्य शासनाच्या सूचनांचं पालन करणे आवश्यक आहे. सध्या मुंबई, पुण्याहून मुळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र अशा लोकांना गावी प्रवेश दिला जात नाहीये. त्यांच्याकडे संशयाने न पाहता आपल्या परिजनांना गावी येऊ द्या त्यांना अडवू नका असे आवाहन करत बाधीत रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने वागतानाच माणुसकी सोडून नका असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी (ओपीडी) बंद ठेवली आहे. वास्तविक संचारबंदीतून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.