मुंबईः विशेष प्रतिनिधी
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहेत. या आजाराला रोखण्यासाठी या पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जीम, जलतरण तलाव आदी बंद करण्याचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत यासंदर्भात निवेदन वाचून दाखवित याविषयीचा अध्यादेश काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील रूग्णांची जास्त असल्याने या दोन शहरातील शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय खाजगी कंपन्यांना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरून काम करण्याची मुभा द्यावी असे आदेशही जारी करण्यात आली आहे. सद्यपरिस्थितीत १० वी आणि १२ वीच्या परिक्षा सुरु राहणार असून शाळा आणि विद्यापीठ स्तरावरील परिक्षांबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी शक्यतो गर्दीची ठिकाणी टाळावीत,मॉल, रेस्टॉरंट-हॉटेल्समध्ये जाणे टाळावेत, क्रिडा स्पर्धा, राजकिय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमे आयोजित करू नयेत किंवा त्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याशिवाय स्थानिक प्रशासनाने अशा गोष्टींना परवानगी दिली असेल ती लगेच रद्द करण्यात येईल असे सांगत पुढील १५ दिवस आपल्याला काळजी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी या आजाराबाबत जनजागृती करण्यासंदर्भात आरोग्य विभाग, रूग्णालयाचे प्रमुख यांची एक टीम तयार करून त्यासंदर्भातील व्हीडीओ व्हायरल करावेत अशी मागणी करत फिलीपाईन्सची राजधानी मनिला येथे विदर्भाचे २४ विद्यार्थी अडकले आहेत. राज्यातील अनेक विद्यार्थी अनेक ठिकाणी अडकले आहेत. त्यांना परत आणण्याच्या अनुषंगाने योजना करावीत अशी मागणी करत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष कक्ष स्थापन करावा असे ते म्हणाले.