मुंबई : प्रतिनिधी
भिमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंबेडकरी बांधवांनी काढलेल्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र तरीही वेळीच माहिती पोहोचली नाही. त्यामुळे हजारो कार्यकर्त्ये जिजामाता उद्यानाजवळ पोहोचले आणि तेथूनच या दलित समाजाने मोर्चाला सुरुवात केली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली.
या एल्गार मोर्चाला भीम आर्मीने पाठींबा देत मोर्चात भीम आर्मीचे कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. हे कार्यकर्त्ये निळ्या रंगाच्या भीम आर्मी लिहिलेल्या टोप्या घालून सहभागी झाल्याने मोर्चेकऱ्यांबरोबरच मुंबईकरांचेही लक्ष वेधत होते. सहभागी कार्यकर्त्यांनी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या सुटकेविषयीच्या आणि संभाजी भिडेला अटक करण्याच्या घोषणा देत होते. त्याचबरोबर अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या जय घोषाच्या घोषणा देत पुढे चालले होते. त्यामुळे मोर्चात मोठ्या प्रमाणावर जोष संचारला.
या मोर्चासाठी मुंबई, उपनगरासह राज्यातील अनेक भागातून मोठ्याप्रमाणावर जिजामाता उद्याना जवळ पोहोचला. मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांकडून भिडेच्या अटकेसाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात येत होत्या. तसेच सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है सारख्या घोषणाही देत होते.
झाले असे !
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा काढला जाणार होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आणि मोर्चा थेट आझाद मैदानात सुरू झाला. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर मोर्चा जिजामाता उद्यान येथून निघणार असल्याची माहिती आंदोलकांना मिळाली होती. त्यामुळे सकाळपासूनच आंदोलक जिजामाता उद्यान परिसरात जमू लागले होते.