मुंबईः प्रतिनिधी
मुस्लिम समाजातील महिलांना अनिष्ट अशा तीन तलाक पध्दतीतून सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन तलाक विधेयकाच्या माध्यमातून कायदा आणण्यात येत आहे. मात्र हा कायदाच मुस्लिम समाजातील महिलांच्या विरोधात असल्याचे सांगत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेने आज शनिवारी मोर्चा काढत विरोध दर्शविला.
केंद्र सरकारच्या या नव्या कायद्यामुळे मुस्लिम समाजातील महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये समिश्र भावना निर्माण झाली होती. त्यातच काही कर्मठ मुस्लिमवाद्यांनी या कायद्यावर कडक भाषेत टीका करत विधेयकाच्या मंजुरीला विरोध दर्शविला होता. तर काही जणांनी याचे स्वागत केले होते.
त्यातच आता मुस्लिम पर्सनल ल़ॉ बोर्डच्या महिला शाखेने आणि कूल जमात या संघटनेच्यावतीने या विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. त्यामुळे आझाद मैदानाच्या समोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. या मोर्चात मुंबईसह महाराष्ट्रातील महिलांबरोबर देशातील अनेक महिलांनी यात सहभाग घेतला.
यावेळी महिलांच्या हातात मुस्लिम महिला विरोधी तीन तलाक विधेयक मागे घ्या, शरीयत कायद्यात ढवळाढवळ करू नका आणि मुस्लिम महिलांना त्यांच्या हक्कापासून वंचित करण्याचे थांबवा अशा आशयाचे पोस्टर घेतल्याचे दिसत होते. त्याचबरोबर यावेळी उभारण्यात आलेल्या स्टेजवर महिलांनी एकाही पुरूषाला स्थान दिले नाही. सर्व गोष्टी महिलांनीच हाती घेतल्याचे दिसून येत होते.