शेवटच्या श्वासापर्यंत व रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीसाठी काम करणार असा, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे. शनिवारी सायंकाळी नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्य कार्यालयात जयदीप कवाडे यांचा वाढदिवस युवा चेतना दिन म्हणून साजरा करण्यात आला.
भव्य सत्कार सोहळ्यात लॉंग मार्च प्रणेते व पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते भाई जयदीप कवाडे यांना शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश भाई उन्हवने, जेष्ठ साहित्यिक ताराचंद खांडेकर, कवी ई. मो. नारनवरे, सौ. रंजना कवाडे, सौ. प्रतिमा कवाडे यांच्यासह विदर्भ व जिल्हयातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, सध्या राज्यात ‘आरक्षण’ या नावावर राजकारण करणाऱ्यांना खऱ्या अर्थाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजलेच नाहीत. समाजाची दिशाभूल करून आपली पोळी शेकणाऱ्यांना अद्दल घडवली पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या तरतुदी नुसार सर्व समाजाच्या हक्काचे आरक्षण करून दिले आहे. त्याला अडथळा हा फक्त राजकीय नेत्यांकडून झालेल्या घोळातून होत आहे. महाराष्ट्रातील महायुतीची सरकार ही यासर्व बाबीचा जातीने लक्ष देत आहे. तसेच लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणावर थाडसी निर्णय घेणार असेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.
रिपब्लिकन’ एकमेव राजकीय पर्याय
‘रिपब्लिकन’ हा एकमेव राजकीय पर्याय डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे. रिपब्लिकन लोकांना शासनकर्ती जमात बनवण्याची आता हिच ती वेळ आहे, असे कवाडे यावेळी म्हणाले. आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीमध्ये समाजाच्या उध्दारासाठी पाच पिढ्यांपासून कवाडे कुटुंबिय समर्पित आहे. हे सर्व करीत असताना इतर राजकीय रंग, चळवळ बघितली. पंरतु, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची रिपब्लिकन ही संकल्पना साकार करण्याचे कार्य पीपल्स रिपब्लिकन पार्टी करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
देशातील आणि राज्यातील युवकांना पक्षात मोठ्या प्रमाणात नेतृत्व देण्यात येणार आहे. पार्टीच्या विस्तार करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यावर मोठी जबाबदारी येत्या काळात देण्यात येणार असल्याचे जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. कार्यकत्यांकडून मिळालेले प्रेम हाच खरा सत्कार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
‘संविधान मनोहर यांच्या भीम गीतांचा जलसा
भव्य सत्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे ख्यातनाम भीम शाहिर ‘संविधान मनोहर यांच्या भीम गीतांचा जलसा कार्यक्रमाने परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, युवक प्रदेश संघटक मृणाल गोस्वामी, नागपुर शहर अध्यक्ष कैलाश बॉबले, जेष्ठ नेते बालू मामा कोसमकर, नागपुर जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, नागपुर शहर युवक आघाडी अध्यक्ष सोहेल खान भगवानदास भोजवानी, अजय चव्हाण, नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष संजय खांडेकर, गौतम गेडाम, प्रकाश मेश्राम, सौ प्रतिमा ज. कवाडे, सविताताई नारनवरे, पूनम मटके, शीतल खान, विपीन गाडगीलवार, रोशन तेलरांधे, पियुष हलमारे, सुरेश बोनदाडे, गौतम धुलकर, कुशीनारा सोमकुवर, वसीम खान, हिमांशु मेंढे यांनी विशेष प्रयत्न केले.
रक्तदान शिविरासह विविध सामाजिक उपक्रम
यावेळी वाढदिवसानिमित्त ‘युवा चेतना दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेने तर्फे शहरातील विविध अनाथालय, रुग्णालयात फळवाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवाय सर्व विधानसभा मतदार संघात रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.